*सामाजिक सलोखा कायम ठेवण्याबाबत नंदुरबार जिल्हा तैलिक समाजाचे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील जनसामान्यांना विनम्र निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सामाजिक सलोखा कायम ठेवण्याबाबत नंदुरबार जिल्हा तैलिक समाजाचे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील जनसामान्यांना विनम्र निवेदन*
*सामाजिक सलोखा कायम ठेवण्याबाबत नंदुरबार जिल्हा तैलिक समाजाचे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील जनसामान्यांना विनम्र निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मागील गेल्या काही दिवसांपासून तैलिक समाजातील भाजपचे माजी नेते विजय चौधरी यांच्या संदर्भातील कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, त्यामध्ये विविध समाजातील माता - भगिनी यांच्याबाबत आक्षेपार्ह व अवमानकारक शब्दप्रयोग करण्यात आल्याचा आरोप जिल्ह्यातील विविध समाज व संघटनामधून केला जात आहे. या प्रकरणामुळे नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक व राजकीय वातावरण अस्वस्थ झाले असून, जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील इतर विविध समाजसंघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा तैलिक समाजाची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असल्याने, विजय चौधरी हे अनेक वर्षे राजकीय व सामाजिक पदावर म्हणून वावरले असले, तरी त्यांच्या कथित वक्तव्यांशी अथवा वैयक्तिक कृतीशी नंदुरबार जिल्हा तैलिक समाजाचा कोणताही हितसंबंध नाही. कोणतीही व्यक्ती संपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व करत नाही. जर संबंधित कथित ऑडिओ क्लिपमधील बाबी सक्षम यंत्रणांच्या चौकशीत सत्य असल्याचे सिद्ध झाले, तर अशा प्रकारची भाषा, महिलांचा अवमान करणारी मानसिकता आणि समाजात तेढ निर्माण करणारे कोणतेही वक्तव्यचा तैलिक समाजातर्फे तीव्र शब्दांत निषेध करण्यात येत आहे, प्रत्येक माता-भगिनीचा सन्मान हा तैलिक समाजासाठी सर्वोच्च आहे.
वास्तविक पाहता, नंदुरबार जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात तैलिक समाजाचे योगदान नेहमीच उल्लेखनीय राहिले आहे. समाजातील मान्यवरांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार समाजहित, लोककल्याण, शैक्षणिक प्रगती, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत असते. समाजात ऐक्य, बंधुभाव आणि सलोखा टिकवून ठेवण्याची गौरवशाली परंपरा तैलिक समाजाने सातत्याने जोपासली आहे.
तैलिक समाज हा संतश्रेष्ठ श्री जगनाडे महाराज यांच्या विचारांचा वारसा जपणारा समाज आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संत-महात्मे तसेच राष्ट्रपुरुषांनी दिलेल्या समता, मानवता, बंधुभाव आणि सामाजिक सौहार्दाच्या मूल्यांचे पालन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न समाजातील प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने करत असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या महिलांचा अवमान करणाऱ्या, समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या किंवा घृणास्पद कृत्यांचे तैलिक समाज कधीही समर्थन करत नाही. याच पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा तैलिक समाजातर्फे स्पष्टपणे नमूद करण्यात येत आहे की, विजय चौधरी यांच्या संदर्भातील कथित ऑडिओ क्लिप प्रकरण हे त्यांचे वैयक्तिक व राजकीय स्वरूपाचे प्रकरण आहे. त्याचा तैलिक समाजाशी किंवा समाजातील लाखो निष्पाप बांधवांशी कोणताही संबंध जोडणे योग्य नाही. एखाद्या व्यक्तीच्या कथित कृतीवरून संपूर्ण समाजाला दोषी धरणे किंवा समाजाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे हे अन्यायकारक असून सामाजिक सलोख्यास बाधा आणणारे आहे.
विविध समाजातील माता-भगिनींच्या सन्मानासाठी लोकशाही मार्गाने होत असलेल्या प्रयत्नांचा नंदुरबार जिल्हा तैलिक समाज नेहमीच आदर करतो. सत्य समोर यावे, निष्पक्ष चौकशी व्हावी आणि कायद्यानुसार योग्य ती कारवाई व्हावी, हीच तैलिक समाजाची भूमिका आहे.
म्हणून नंदुरबार जिल्हा तैलिक समाज सर्व जाती, धर्म, पंथ आणि समाजातील बांधवांना विनम्र आवाहन करत आहे की, कृपया या प्रकरणाकडे एका व्यक्तीच्या वैयक्तिक जबाबदारीच्या दृष्टीने पाहावे. कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण तैलिक समाजाला या प्रकरणाशी जोडू नये. आपण सर्वांनी परस्पर आदर, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्य कायम ठेवून महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याची परंपरा अधिक दृढ करावी, हीच नंदुरबार जिल्हा तैलिक समाजाची मनापासून विनंती आहे. नंदुरबार जिल्हा तैलिक समाज सर्व समाजांचा सन्मान करतो. समाजामध्ये शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी नंदुरबार जिल्हा तैलिक समाज सदैव कटिबद्ध असून भविष्यातही समाजहित आणि जनसेवेसाठी कार्यरत राहू, असे नंदुरबार जिल्हा तैलिक समाजातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.



