*राष्ट्रीय स्तरावर नंदुरबारचा सुवर्ण झेंडा ‘ई-आरोग्य धमनी’ उपक्रमाला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार बहाल, आदिवासी भागातील माता व बाल आरोग्यासाठी ठरला वरदान; जिल्हास्तरीय ई-गव्हर्नन्स उ
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राष्ट्रीय स्तरावर नंदुरबारचा सुवर्ण झेंडा ‘ई-आरोग्य धमनी’ उपक्रमाला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार बहाल, आदिवासी भागातील माता व बाल आरोग्यासाठी ठरला वरदान; जिल्हास्तरीय ई-गव्हर्नन्स उ
*राष्ट्रीय स्तरावर नंदुरबारचा सुवर्ण झेंडा ‘ई-आरोग्य धमनी’ उपक्रमाला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार बहाल, आदिवासी भागातील माता व बाल आरोग्यासाठी ठरला वरदान; जिल्हास्तरीय ई-गव्हर्नन्स उपक्रमात देशात प्रथम क्रमांकाचा मान*
नंदूरबार(प्रतिनिधी):-सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आदिवासी व अतिदुर्गम भागातील माता व बालकांच्या आरोग्य सेवेत गुणात्मक परिवर्तन घडवून आणणाऱ्या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ‘ई- आरोग्य धमनी’ या नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमाला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2026 अंतर्गत पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे. हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आणि राजस्थानचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
जिल्हास्तरीय ई-गव्हर्नन्स उपक्रम या विभागात देशभरातील विविध उपक्रमांमधून नंदुरबारच्या ‘ई- आरोग्य धमनी’ प्रकल्पाने सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत हा मानाचा राष्ट्रीय सन्मान पटकावला आहे. राजस्थानमधील जयपूर येथे 1 ते 2 जुलै 2026 दरम्यान दिमाखात पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा बहुमान प्रदान करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांच्या दूरदर्शी नेतृत्व, प्रभावी नियोजन आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्याने ही ऐतिहासिक कामगिरी नोंदविली आहे.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या माध्यमातून हा नाविन्यपूर्ण डिजिटल आरोग्य उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. आदिवासी व अतिदुर्गम भागातील माता व बाल आरोग्य सेवा अधिक सक्षम, परिणामकारक आणि वेळेवर उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘ई- आरोग्य धमनी’ : एकाच डिजिटल व्यासपीठावर संपूर्ण आरोग्य व्यवस्थापन, डॉ. मित्ताली सेठी
राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार सोहळ्यात ‘ई- आरोग्य धमनी’ प्रकल्पाचे सादरीकरण करताना जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी सांगितले की, ‘ई- आरोग्य धमनी’ हा आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेला जिल्हास्तरीय डिजिटल प्रशासनाचा अभिनव नमुना आहे. या व्यासपीठाद्वारे डिजिटल आरोग्य जनगणना, अग्रिम पंक्तीतील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हेल्थ ॲप, सिकल सेल मिशन, आरोग्य कृती केंद्र तसेच एकात्मिक पाठपुरावा प्रणाली यांसारख्या विविध आरोग्य सेवांचे एकाच डिजिटल मंचावर एकत्रीकरण करण्यात आले आहे. या प्रणालीमुळे आरोग्यविषयक माहितीचे प्रभावी व्यवस्थापन, वेळेवर देखरेख, लाभार्थ्यांचे सातत्यपूर्ण अनुवर्तन तसेच विविध विभागांमधील अधिक सक्षम समन्वय सुनिश्चित होत आहे. परिणामी दुर्गम व आदिवासी भागातील आरोग्य सेवांची गुणवत्ता, परिणामकारकता आणि नागरिकांपर्यंतची पोहोच लक्षणीयरीत्या वाढली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून गर्भवती महिला व बालकांच्या आरोग्याचे अचूक, सातत्यपूर्ण आणि तत्काळ अनुवर्तन केले जाते. त्यामुळे संभाव्य आरोग्यधोके वेळेत ओळखणे, आवश्यक वैद्यकीय उपचार तत्काळ उपलब्ध करून देणे आणि आरोग्य सेवांचे प्रभावी नियोजन करणे शक्य झाले आहे. परिणामी कुपोषण, माता मृत्यूदर आणि बालमृत्यूदर कमी करण्यासाठी या तंत्रज्ञानाची मोलाची मदत होत असून, दुर्गम भागातील हजारो कुटुंबांसाठी हा उपक्रम खऱ्या अर्थाने वरदान ठरला आहे. या अभिमानास्पद राष्ट्रीय यशाबद्दल ‘टीम नंदुरबार’चे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांनी संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे हे यश असल्याचे नमूद करून मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी, लोकाभिमुख आणि परिणामकारक वापर करून नंदुरबार जिल्ह्याने देशासमोर एक नवा, प्रेरणादायी आणि अनुकरणीय आदर्श निर्माण केला असून, हा राष्ट्रीय सुवर्ण सन्मान संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याच्या भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.



