*विद्यार्थ्यांनी पाठयपुस्तकापुरते मर्यादित न राहता अवांतर वाचनाची सवय ठेवावी-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विद्यार्थ्यांनी पाठयपुस्तकापुरते मर्यादित न राहता अवांतर वाचनाची सवय ठेवावी-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले*
*विद्यार्थ्यांनी पाठयपुस्तकापुरते मर्यादित न राहता अवांतर वाचनाची सवय ठेवावी-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले*
नांदेड(प्रतिनिधी):-शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासाचे आणि उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे प्रभावी साधन असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात जिल्हा परिषद शाळांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्य पुस्तकांपुरते मर्यादित न राहता अवांतर वाचनाची सवय लावून ज्ञानाचा विस्तार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.15 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शाळा प्रवेशोत्सव अभियानांतर्गत नांदेड तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कुल, मरळक बु. येथे उत्साहपूर्ण वातावरणात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले उपस्थित होते. यावेळी त्यांनी शालेय वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त करुन, जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षणपद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. जि. प. हा. मरळक बु. या शाळेस भेट देताना आपल्या शालेय जीवनातील आठवणी जाग्या झाल्याचे सांगून, आपले प्राथमिक शिक्षणही जिल्हा परिषद शाळेतच झाल्याचा उल्लेख केला. संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जात असून, शाळेस जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी भेट देत आहेत. नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करताना त्यांच्या आयुष्यातील शाळेतील पहिल्या पावलाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळांमधूनच खरे शिक्षण मिळते आणि जीवनाला योग्य आकार मिळतो, असे प्रतिपादनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांनी पाठ्य पुस्तकांबरोबरच अवांतर वाचनाची सवय लावावी, यासाठी शाळेतील वाचनालयातील पुस्तके विद्यार्थ्यांसाठी खुली ठेवावीत, अशी सूचना त्यांनी केली. विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या आधारावर यश संपादन करावे जिल्हाधिकारी
विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या आधारावर यश संपादन करावे, असे आवाहन करताना शाळेच्या दहावीच्या परीक्षेचा 95 टक्के निकाल लागल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. माध्यमिक शिक्षकांची कमतरता असतानाही प्राथमिक शिक्षकांनी अतिरिक्त वेळ देऊन विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण केल्याबद्दल सर्व शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी मरळक येथील इयत्ता 10 वीची कु. अंजली शंकर नरवाडे ही मुलगी शाळेतून पहिली आली असून तिला 92 टक्के गुण मिळाले आहेत. आज जिल्हाधिकारी कर्डीले यांनी तिचा सत्कार केला. यावेळी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्या, या पार्श्वभूमीवर कु.अंजली नरवाडे या मुलीचे आईवडील मजूरीचे काम करतात. आईवडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून अंजलीने मिळवलेले गुण हे नक्कीच इतर विदयार्थ्यांसाठी प्रेरणादाई असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शाळेतील भौतिक सुविधांची आवश्यकता पूर्ण करण्याचे आश्वासन देताना खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच मैदानी खेळांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे गणवेश, पाठ्यपुस्तके व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी नवप्रवेशित विदयार्थ्यांची ग्रामस्थांनी बैलगाडीतून वाजतगाजत शाळेपर्यंत मिरवणूक काढली.
हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये व शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला.



