*निवडणुकांचा धुरळा संपला आता महामार्गावरील धुरळा कधी?मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचा सवाल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*निवडणुकांचा धुरळा संपला आता महामार्गावरील धुरळा कधी?मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचा सवाल*
*निवडणुकांचा धुरळा संपला आता महामार्गावरील धुरळा कधी?मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचा सवाल*
मुंबई(प्रतिनिधी):-लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपरिषद या सर्व निवडणुकांचा धुरळा आता संपलेला आहे. घोषणा, आश्वासने, आरोप-प्रत्यारोप थांबले आहेत. मात्र एक धुरळा अजूनही तसाच आहे तो म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरील धुरळा. हा धुरळा थांबवण्यासाठी आता सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून जनतेसोबत एकत्र येण्याची वेळ आली आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून आम्ही सर्वसामान्य जनता हा लढा लढतो आहे. रस्त्यावर उतरून, निवेदने देऊन, आंदोलनं करून, वेळप्रसंगी उपोषण करत आम्ही आवाज उठवत आलो. पण कटू सत्य असं आहे की सर्वसामान्य जनतेच्या पाठी मोजकेच हात असतात; तर राजकीय शक्तीच्या पाठी बलाढ्य आणि असंख्य हात असतात. आज गरज आहे की हे सर्व हात सत्ताधारी, विरोधक, लोकप्रतिनिधी एकत्र येऊन प्रशासनाला जनतेच्या एकीचं बळ दाखवतील. आजही वास्तव तसंच आहे.
रायगड जिल्ह्यातील कोलेटी, नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव, तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, संगमेश्वर, हाताखांबा, पाली, निवळी, लांजा या सर्व ठिकाणी महामार्गाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. कुठे रस्ता खोदलेला, कुठे सेवा रस्ते नाहीत, कुठे पाणी साचलेलं, तर कुठे धुळीने नागरिकांचा श्वास कोंडलेला. दरवेळी एकच वाक्य ऐकायला मिळतं “मार्च-मे पर्यंत काम पूर्ण करू.” पण हे केवळ आश्वासन आहे, सत्य नाही. कारण जर खरंच मार्चपर्यंत काम पूर्ण होणार असेल, तर आजपर्यंत जनतेसमोर सविस्तर आराखडा का मांडला जात नाही? कोणता टप्पा कधी पूर्ण होणार? कोणत्या भागात अडथळे आहेत? जबाबदारी कुणाची? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं आजही मिळत नाहीत. हा महामार्ग केवळ रस्ता नाही; तो कोकणकरांचा श्वास आहे, अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पर्यटन, शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य सगळं या रस्त्यावर अवलंबून आहे. पण आज याच रस्त्यावर अपघात, वाहतूक कोंडी, धूळ आणि चिखल हेच नशिबी आले आहेत
इतकं मात्र नक्की सर्वसामान्य जनता लढत आली आहे आणि लढत राहील. सत्ता बदलली तरी प्रश्न सुटत नसेल, तर प्रश्न विचारणं थांबणार नाही. आता तरी सत्ताधारी आणि विरोधकांनी जनतेसोबत उभं राहून मुंबई-गोवा महामार्गावरील धुरळा कायमचा संपवावा, हीच कोकणकरांची अपेक्षा असल्याचे मत महामार्ग जनआक्रोश समितीच्या वतीने अध्यक्ष अजय यादव, सचिव रुपेश दर्गे व खजिनदार संजय जंगम यांनी व्यक्त केले आहे.



