*वसंतराव नाईक महाविद्यालयात एक दिवसीय 'विद्यार्थी संवेदनशीलता मार्गदर्शन’ कार्यशाळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वसंतराव नाईक महाविद्यालयात एक दिवसीय 'विद्यार्थी संवेदनशीलता मार्गदर्शन’ कार्यशाळा संपन्न*
*वसंतराव नाईक महाविद्यालयात एक दिवसीय 'विद्यार्थी संवेदनशीलता मार्गदर्शन’ कार्यशाळा संपन्न*
शहादा(प्रतिनिधी):-येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष (आय.क्यु.ए.सी.) व भौतिकशास्त्र विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव; प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम.उषा), शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली; यांच्या अंतर्गत “सेन्सिटायझेशन प्रोग्राम्स फॉर स्टुडटस” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन 3 फेब्रुवारी 2026 मंगळवार रोजी करण्यात आले होते. सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव उद्घाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर त्यांच्यासह या कार्यशाळेच्या उद्घाटक सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सचिव व जिल्हा मुख्यालय स्काऊट गाईड आयुक्त मा. सौ. वर्षा जाधव, प्रशासकीय प्रमुख प्रा. डॉ. हिमांशु जाधव, कला व विज्ञान महाविद्यालय बामखेडा येथील प्राचार्य व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. एच. एम. पाटील, पीएसजीव्हीपी महाविद्यालय, शहादा येथील भूगोलशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. यू. व्ही. निळे, मुख्य डाक कार्यालय, शहादा येथील डाक मास्तर पवन भामरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. राठोड मंचावर उपस्थित होते. प्रारंभी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, कै. नानासाहेब जाधव, खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी, व संस्थेचे प्रेरणास्थान वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन व द्वीपप्रज्वलन करून कार्यशाळेची मांगलिक सुरुवात झाली. या कार्यशाळेत उद्घाटनपर संबोधनात डॉ. एच. एम. पाटील म्हणाले की, या संकुलाशी, इथल्या प्रत्येक घटकाशी, व्यक्तींची या संस्थेशी माझे आत्मीय ऋणानुबंध आहेत आणि ते मी जपून ठेवलेत ही मोठी संवेदनशीलता होय. या संकुलातील वातावरण अत्यंत भक्तीपूर्ण आहे. या संकुलात प्रवेश करणे म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन देवदर्शन करणे होय. युवा विद्यार्थ्यांनी ही संवेदनशीलता जपत आपला विकास साधण्याचे सांगत त्यांनी या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ. वर्षा जाधव आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्यात की, भ्रमणध्वनीच्या व्यसनात युवा पिढी असंवेदनशील बनत जाणे हा चिंता आणि चिंतनाचा विषय आहे. युवा पिढीने या आभासी जगातून बाहेर पडत वास्तव दुनियेशी आपली नाळ जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्यातील जाणिवा आणि संवेदनशीलता जागवण्याचे, ते वाढवण्याचे आवाहन करत त्यांनी कार्यशाळेला सुयश चिंतले. महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. डी. डी. राठोड आपल्या मनोगतात म्हणाले की, हे महाविद्यालय एक संस्कार केंद्र आहे. आजच्या या जीवघेण्या स्पर्धेच्या युगातही माझ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जाणिवांसह समाजाप्रती आपुलकी दाखवत तळमळीने जीवन प्रवास करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
या कार्यशाळेच्या उद्घाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव बोललेत की, समाजात वावरतांना संवेदनेसह जागरूक रहा. आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवा. पर्यावरणाविषयी, आर्थिक, सामाजिक व डिजिटल बाबींप्रती जागरूकता वाढवा. संवेदनशीलतेने जगत असतांना शिस्त-नितीमूल्ये जोपासा. इंटरनेटचा नेटका, नेमका, मर्यादित, संयमित, सुरक्षित आणि प्रभावी वापर करण्याचे आवाहन करत त्यांनी या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात 'पर्यावरण साक्षरता: संवर्धन आणि संरक्षण' या विषयावर आपली मते मांडत प्रा. डॉ. यू. व्ही. निळे म्हणाले की, ई- कचरा, निर्माल्य संकलन पर्यावरण रक्षणाचा उत्तम मार्ग आहे. मानव व पर्यावरण एक दुसऱ्याचे पूरक आहेत. ज्या दिवशी पृथ्वीवरील समस्त मानव प्राण्यांत पर्यावरणाप्रती करुणा आणि संवेदनशीलतेचा उगम होईल तो दिवस मानवधर्मासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. आपण निसर्गाप्रती ऋणी असले पाहिजे असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाला मनापासून धन्यवाद देण्याचे आवाहन केले. द्वितीय सत्रांत 'दैनंदिन वित्तीय साक्षरता' या विषयावर पवन भामरे विद्यार्थ्यांना संबोधित करतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत जागरूकता, वर्तणूक, शिस्त यांचा मोठा वाटा आहे. भारतीय डाक व्यवस्था म्हणजे या देशातील सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत संवादाची देवाण घेवाण करणे होय. डाक विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या दैनंदिन बचतीच्या अनेक योजना विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहेत. यासह त्यांनी अल्पावधी बचत, दीर्घकालीन गुंतवणूक, महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, विद्यार्थी बचत मंडळ यासह अनेक योजनांची व गुंतवणुकीची ओळख करून दिली. तृतीय सत्रांत शहादा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ आपल्या 'डिजिटल साक्षरता: माहिती व तंत्रज्ञान' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आज समाजात डिजिटल वस्तू हाताळण्याप्रती जागरूकता वाढीस लागणे अत्यंत गरजेचे आहे. समाज माध्यमांच्या योग्य उपयोग करत फेक अकाउंटला बळी पडू नका. पासवर्ड व्यवस्थित ठेवत आर्थिक फसवणुकीला आळा घाला. फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम वर आपल्या व्यक्तिगत चित्रफिती, छायाचित्रांची अनावश्यक देवाण-घेवाण टाळा. आभासी जगातील कुठल्याही अमिषाला बळी पडू नका. आज वित्तीय धोके वाढले आहेत, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वाय-फाय या इंटरनेट सुविधेचा वापर न करण्याचे आवाहन त्यांनी केले. चतुर्थ सत्रांत नंदुरबार येथील आर्थिक व सांपत्तिक नियोजनकार ए. एम. शर्मा 'आजीवन यशस्वीतेसाठी आर्थिक साक्षरता' या विषयावर विद्यार्थ्यांना आर्थिक मंत्र देत म्हणाले की, बँकेत अनेक प्रकारची बचत खाती असतात. त्यात आपल्यासाठीच्या योग्य त्या गुंतवणूक व्यवस्थेची निवड करावी. सर्व नोंदी काळजीपूर्वक लिहून नेट बँकिंगसाठीचा पासवर्ड जपून ठेवायला हवा. आपली आवश्यकता ओळखत, अभ्यास करून हवे तेथेच पैसे गुंतवा. यासह बचत आणि गुंतवणुकीतला सूक्ष्म फरक समजावून सांगत त्यांनी आर्थिक साक्षर नागरिक- सक्षम समाज- मजबूत राष्ट्र-वेगवान व विश्वास पात्र विकासासाठी सज्ज होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
पाचव्या सत्रांत 'दैनंदिन जीवनातील सामाजिक साक्षरता' या विषयाला छोट्या छोट्या उदाहरणांद्वारे पटवून देत नंदुरबार येथील कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. श्रीराम दाऊतखाने म्हणाले की, निकोप लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजावणे ही एक फार मोठी सामाजिक व संवेदनशील साक्षरता आहे. यासह अन्नसाक्षरतेत अन्न वाया न जाऊ देणे सामाजिक साक्षरतेचे उत्तम उदाहरण आहे. ई-कचरा संकलन अभियानाच्या माध्यमाने सगळा कचरा व्यवस्थितपणे एकत्र करून त्याचे शास्त्रीय पद्धतीने विघटन केले गेले पाहिजे असे आवर्जुन सांगितले.
आयक्यूएसी चे समन्वयक व कार्यशाळेचे संयोजक डॉ. बी. वाय. बागुल यांनी कार्यशाळेची प्रस्तावना करत कार्यशाळेचा विषय निवड व उपयुक्ततेवर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन प्रा. एन. एम. साळुंखे तर आभार प्रकटन प्रा. डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले. या संपूर्ण कार्यशाळेचे तांत्रिक संचालन डॉ. एस. एस. ईशी व प्रयोगशाळा परिचर श्री. कैलास सोलंकी यांनी केले. या संपूर्ण कार्यशाळेचे वृत्त संकलन व विस्तृत विद्यापीठ अहवाल लेखन प्रा. अजित चव्हाण यांनी केले. तर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. के. एल. पाटील, प्रा. जी. ए. पडघन, प्रा. राम हजारी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी व प्राध्यापकेतर बंधू यांनी परिश्रम घेतले.



