*राजापूर–मुंबई सायंकाळी 5 वाजता सुटणारी एस. टी. पुन्हा सुरु करा-अझीम जैतापकर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर–मुंबई सायंकाळी 5 वाजता सुटणारी एस. टी. पुन्हा सुरु करा-अझीम जैतापकर*
*राजापूर–मुंबई सायंकाळी 5 वाजता सुटणारी एस. टी. पुन्हा सुरु करा-अझीम जैतापकर*
राजापूर(प्रतिनिधी):-राजापूर ते मुंबई सायंकाळी 5 वाजता सुटणारी एस. टी. बस सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी राजापूर काँग्रेस शहराध्यक्ष अझीम इब्राहिम जैतापकर यांनी राजापूर आगार व्यवस्थापकांना लेखी निवेदन सादर केले आहे. ही बस सेवा केवळ आठ दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ती अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राजापूर –मुंबई हा मार्ग विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः सायंकाळी 5 वाजताची एस. टी. ही मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची वेळ असल्याने या बसला मोठा प्रतिसाद मिळत होता. मात्र अचानक ही सेवा बंद झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर बस सेवा पूर्वीच्या वेळेत तातडीने सुरू करावी, अशी ठाम मागणी जैतापकर यांनी केली आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, राजापूर शहरातील जवाहर चौक येथे वाहतूक नियंत्रण कक्ष असणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या प्रवाशांना गाडी कुठे आहे, ती कोणत्या वेळेला येणार आहे याबाबत योग्य माहिती मिळत नाही. वाहतूक नियंत्रण कक्ष सुरू झाल्यास एस. टी. बसच्या वेळा, मार्ग व बदल याबाबत प्रवाशांना त्वरित माहिती मिळेल आणि गोंधळ कमी होईल. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळून वाहतूक व्यवस्थाही अधिक सुरळीत होईल. तसेच नगरपरिषदेने नदीपात्रात सपाटीकरणाचे काम पूर्ण केले असल्याने एस. टी. बस नदीपात्रातून फिरवून आणाव्यात, अशीही मागणी जैतापकर यांनी केली आहे. यामुळे शहरातील जवाहर चौकावरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि बसचे वेळापत्रकही अधिक अचूक राहण्यास मदत होईल.नदीपात्रातील रस्ता सुरक्षित असून त्याचा वापर केल्यास प्रवाशांना वेळेची बचत होईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. राजापूर आगार व्यवस्थापकांनी निवेदन स्वीकारून याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, प्रवाशांनीही सायंकाळी 5 वाजताची राजापूर –मुंबई एस. टी. पुन्हा सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ही सेवा सुरू झाल्यास राजापूर परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून एस. टी. महामंडळालाही चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



