,*वडदहसोळ येथील ‘साई मित्र मंडळा’ च्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा, संस्कृती आणि कर्तृत्ववान लेकींचा गौरव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
,*वडदहसोळ येथील ‘साई मित्र मंडळा’ च्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा, संस्कृती आणि कर्तृत्ववान लेकींचा गौरव*
,*वडदहसोळ येथील ‘साई मित्र मंडळा’ च्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा, संस्कृती आणि कर्तृत्ववान लेकींचा गौरव*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील खालीलवाडी, वडद हसोळ येथील प्रसिद्ध ‘साई मित्र मंडळा’ चा 29 वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक सादरीकरणे आणि भव्य कबड्डी स्पर्धांनी हा सोहळा रंगला. राजापूर पोलिस स्टेशनचे psi शेख यांच्या हस्ते या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. गावातील कर्तृत्ववान तरुणींच्या सत्काराने कार्यक्रमाला विशेष भावनिक किनार लाभली.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशीतील 10 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात ‘निनादेवी पन्हळे (राजापूर)’ संघाने दमदार खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला. तर ‘शिवलिंग खेरवशी (लांजा)’ संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. चुरशीच्या सामन्यांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उत्सवाची सुरुवात पहाटे काकड आरतीने झाली. त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा, साईबाबांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दुपारी साईबाबांची पालखी मिरवणूक भक्तिमय वातावरणात पार पडली. महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ तसेच ‘जाकादेवी झांजगी नृत्य नमन मंडळ, रावरी’ यांच्या नमन कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. दीनदयाळ हॉस्पिटल, लांजा यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमातील सर्वाधिक भावनिक क्षण ठरला तो गावातील दोन कर्तृत्ववान तरुणींच्या सत्काराचा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलीस दलात भरती झालेल्या सोनाली मनोहर भरे हिचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तिच्या यशामुळे संपूर्ण गावाने अभिमान व्यक्त केला. तसेच फॉरेन्सिक सायन्स विषयात सुवर्णपदक मिळवणाऱ्या फिजा मुकादम हिचाही विशेष सत्कार करण्यात आला. आईच्या पाठिंब्यावर आणि संघर्षातून मिळवलेल्या यशामुळे उपस्थित अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. गावातील विद्यार्थ्यांनी या दोन्ही तरुणींकडून प्रेरणा घ्यावी आणि शिक्षणाच्या बळावर गावाचे नाव उज्ज्वल करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला. या सोहळ्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभाग प्रमुख विनोद शिंदे, कुणबी नेते रवींद्र मटकर, मनोहर भरे, गोतावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, साई मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्या नियोजन आणि उत्साहपूर्ण आयोजनामुळे हा वर्धापन दिन गावकऱ्यांच्या स्मरणात कायम राहणार आहे.



