*नंदुरबारच्या दुर्गम भागातील आरोग्य उपकेंद्रे बनली 'भूत बंगले', प्रशासकीय उदासीनतेविरोधात 'युवा क्रांती'चा एल्गार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारच्या दुर्गम भागातील आरोग्य उपकेंद्रे बनली 'भूत बंगले', प्रशासकीय उदासीनतेविरोधात 'युवा क्रांती'चा एल्गार*
*नंदुरबारच्या दुर्गम भागातील आरोग्य उपकेंद्रे बनली 'भूत बंगले', प्रशासकीय उदासीनतेविरोधात 'युवा क्रांती'चा एल्गार*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आधीच आव्हानांच्या गर्तेत असताना, दुसरीकडे शासनाने लाखो रुपये खर्चून उभारलेली आरोग्य उपकेंद्रे प्रशासकीय नाकर्तेपणामुळे 'भूत बंगले' बनत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. तळोदा तालुक्यातील जुवानी, मालदा आणि अमोनी येथील आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊन तीन ते चार वर्षांचा कालावधी लोटला आहे, मात्र केवळ हस्तांतरणाच्या प्रक्रियेत अडकल्याने या वास्तू आज धूळखात पडल्या आहेत. या गंभीर प्रश्नावर 'युवा क्रांती नंदूरबार' सामाजिक संघटनेने आक्रमक पवित्रा घेत थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे जाब विचारला असून, 15 दिवसांत ही केंद्रे सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तळोदा तालुक्यातील ग्रामीण जनतेला वेळेवर उपचार मिळावेत, या उदात्त हेतूने 2020 च्या सुमारास या उपकेंद्रांच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. प्रत्यक्षात या इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊन मोठा काळ उलटला आहे, परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या इमारतींचा ताबा आरोग्य विभागाकडे देण्यात आलेला नाही. 'युवा क्रांती' संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा या स्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली, तेव्हा तिथे अत्यंत धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. देखभालीअभावी या नवीन इमारतींच्या परिसरात झाडे- झुडपे उगवली असून खिडक्या आणि दरवाजांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. जनतेच्या हक्काचा आणि कष्टाचा लाखो रुपयांचा निधी अशा प्रकारे मातीमोल होत असल्याचे पाहून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संघटनेचे प्रदेश समन्वयक विजयसिंग पाडवी आणि जिल्हाध्यक्ष इंजि. संदीप वळवी यांनी प्रशासनावर सडकून टीका केली आहे. एकीकडे डोंगर-दऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना साध्या उपचारांसाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागते, गर्भवती महिलांना रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी आजही खाटेची डोली करावी लागते, अशा परिस्थितीत तयार असलेल्या इमारती वापराविना पडून राहणे हा एकप्रकारे गुन्हासमान प्रकार आहे. जुवानी, मालदा आणि अमोनी येथील ही उपकेंद्रे केवळ शोभेच्या वस्तू बनून राहिली आहेत. या विलंबामुळे इमारतींचे नुकसान तर होतच आहे, शिवाय ग्रामीण जनतेच्या आरोग्याचा प्रश्नही टांगणीला लागला आहे. संघटनेने या निवेदनाद्वारे केवळ इमारती सुरू करण्याची मागणी केली नसून, या दिरंगाईला जबाबदार असणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई करण्याची मागणीही केली आहे. इमारती पूर्ण असूनही त्या कार्यान्वित न होणे, यात कोणत्या तांत्रिक अडचणी होत्या आणि त्या सोडवण्यासाठी इतकी वर्षे का लागली, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. तसेच, सद्यस्थितीत दुरवस्था झालेल्या या इमारतींची तातडीने दुरुस्ती करून तिथे पुरेसा औषधसाठा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी तळोदा तालुका उपाध्यक्ष चिंतामण नाईक आणि ग्राम समिती पदाधिकारी पंकज प्रधान यांनी केली आहे. निवेदन सादर करताना संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, जर या काळात ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर जिल्ह्यातील जनतेला सोबत घेऊन लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा 'युवा क्रांती' संघटनेने दिला आहे. आता या निवेदनानंतर कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन जागे होऊन या 'भूत बंगल्यां'चे रूपांतर पुन्हा आरोग्य मंदिरात करणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



