*99 लाखांचा निधी तरी नाथोबा मंदिराचा रस्ता अरुंद ? आ. राजेश पवारांचा विकास निधी कंत्राटदारांने केला साईडभराव गायब*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*99 लाखांचा निधी तरी नाथोबा मंदिराचा रस्ता अरुंद ? आ. राजेश पवारांचा विकास निधी कंत्राटदारांने केला साईडभराव गायब*
*99 लाखांचा निधी तरी नाथोबा मंदिराचा रस्ता अरुंद ? आ. राजेश पवारांचा विकास निधी कंत्राटदारांने केला साईडभराव गायब*
नरसी(प्रतीनिधी):-नांदेडच्या नायगांव विधानसभा मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणावर व्हावा, ग्रामीण भागातील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने आ. राजेश पवार यांच्याकडून विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामांचा अपेक्षित दर्जा राखला जात नसल्याने विकासकामांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नायगांव तालुक्यातील मरवाळी शिवारातील प्रसिद्ध नाथोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुधारणा कामाचे याचेच उदाहरण समोर आले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग, देगलूर अंतर्गत ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेतून सन 2025- 26मध्ये सुमारे एक किलोमीटर लांबीच्या सी.सी. काँक्रीट रस्त्यासाठी तब्बल 99 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असले तरी कामाच्या दर्जाबाबत स्थानिक नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्ता सुधारण्याऐवजी तो अरुंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एवढेच नव्हे तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आवश्यक असलेला मुरूमाचा साईडभराव अद्याप करण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनांची ये-जा करताना मोठी अडचण निर्माण होत असून, समोरासमोर वाहने आल्यास वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. चारचाकी वाहनधारक विशेषतः त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. या मार्गावर नाथोबा मंदिर, महादेव मंदिर आणि परबतेश्वर मंदिर अशी धार्मिक स्थळे असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे रस्त्याचे काम दर्जेदार व नियमानुसार होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले असल्याची भावना व्यक्त होत आहे. आमदारांचा निधी, कंत्राटदारांची मनमानी? मतदारसंघातील विकासकामांना गती मिळावी म्हणून आमदार राजेश पवार निधी उपलब्ध करून देत असताना, संबंधित कंत्राटदारांकडून कामाच्या दर्जात तडजोड करून शासनाच्या निधीचा अपव्यय केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. निधी जनतेच्या सुविधांसाठी मंजूर होतो; मात्र काम निकृष्ट झाले तर त्याचा थेट फटका जनतेलाच बसतो. त्यामुळे अशा कामांवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे की नाही, असा सवालही उपस्थित होत आहे. कंत्राटदार व संबंधित अभियंता यांच्या संगनमतातून निधीचा गैरवापर झाला असावा, असा आरोप काही नागरिकांनी केला असून, या आरोपांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
काही दिवसांपुर्वी सदर रस्त्याचे लोकार्पण आमदार राजेश पवार व पुनम पवार यांच्या हस्ते गावकऱ्यांच्या उपस्थितीत झाल्याचे दर्शविणारी पाटी घटनास्थळी लावण्यात आली आहे. त्यामुळे लोकार्पण झालेल्या रस्त्याची सद्यस्थिती पाहता संबंधित विभागाने तातडीने स्थळ पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ‘दर्जेदार कामासाठी’ निधी की कंत्राटदारांच्या फायद्यासाठी?99 लाखांचा निधी खर्च करूनही रस्ता अरुंद, साईड भराव अपूर्ण आणि कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी असल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. रस्त्याची निर्धारित रुंदी, काँक्रीटची जाडी व गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य, साईडभराव तसेच मंजूर अंदाज पत्रकानुसार काम झाले आहे का, याची तांत्रिक तपासणी करण्यात यावी.
आमदारांनी विकासकामांसाठी उपलब्ध करून दिलेला निधी जनतेच्या सुविधांसाठी आहे; तो निकृष्ट कामांच्या माध्यमातून वाया जाऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या कामाची तातडीने पाहणी करून दोष आढळल्यास संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी रातोळी - मरवाळी परिसरातील नागरिक व भाविकांकडून होत आहे.



