*गुरुपौर्णिमेनिमित्त मिशन हायस्कूलमध्ये शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडून भावपूर्ण सत्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गुरुपौर्णिमेनिमित्त मिशन हायस्कूलमध्ये शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडून भावपूर्ण सत्कार*
*गुरुपौर्णिमेनिमित्त मिशन हायस्कूलमध्ये शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडून भावपूर्ण सत्कार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, येथे गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करणारा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प अर्पण करून त्यांच्याप्रती आदर, प्रेम व कृतज्ञता व्यक्त केली. संपूर्ण विद्यालय परिसरात आनंद, उत्साह आणि संस्कारमय वातावरण अनुभवायला मिळाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य नूतनवर्षा वळवी या होत्या. व्यासपीठावर उपप्राचार्य विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्राचार्य सौ. नूतनवर्षा वळवी यांनी सर्व विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, गुरु हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील पहिला मार्गदर्शक, प्रेरणादाता आणि संस्कारांचा शिल्पकार असतो. शिक्षक केवळ पुस्तकातील ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करून त्यांना जीवनातील योग्य दिशा देतात. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती नेहमी आदर, कृतज्ञता आणि निष्ठा बाळगून शिक्षणासोबत चांगले संस्कारही आत्मसात करावेत. गुरुपौर्णिमा हा केवळ उत्सव नसून गुरुंच्या ऋणाची जाणीव करून देणारा आणि ज्ञानाचा प्रकाश पुढे नेण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा, परिश्रम आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा स्वीकार करून आदर्श नागरिक बनावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात किशोर गर्दे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व, भारतीय संस्कृतीतील गुरु- शिष्य परंपरा आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील गुरुचे अनन्यसाधारण स्थान याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले. "गुरु हा केवळ ज्ञानदाता नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा प्रेरणास्रोत आहे," असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळेस एडवोकेट प्रीतम निकम यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर विशद केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्येक शिक्षकाला गुलाबपुष्प अर्पण करून त्यांचा सन्मान केला. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची जाणीव ठेवण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सामूहिक छायाचित्र घेण्यात आले. गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा गुरु-शिष्य नाते अधिक दृढ करणारा आणि विद्यार्थ्यांच्या मनात गुरुंबद्दलचा आदर अधिक वृद्धिंगत करणारा ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद दीक्षित व किरण पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनीष पाडवी यांनी मानले.



