*नंदुरबार जिल्ह्यात 'हवामान अनुकूल' व 'पोषण-पूरक' शेतीसाठी भागधारक सल्लागार बैठका संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यात 'हवामान अनुकूल' व 'पोषण-पूरक' शेतीसाठी भागधारक सल्लागार बैठका संपन्न*
*नंदुरबार जिल्ह्यात 'हवामान अनुकूल' व 'पोषण-पूरक' शेतीसाठी भागधारक सल्लागार बैठका संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात हवामान बदलाच्या संकटाचा सामना करू शकणारी आणि कुटुंबाच्या आहारात पोषणाचे मूल्य वाढवणारी शेती विकसित करण्याच्या उद्देशाने 'एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन' (एमएसएसआरएफ)तर्फे नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव (16 मार्च) आणि अक्कलकुवा (17 मार्च) येथे तालुकास्तरीय भागधारक सल्लागार बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेचा मुख्य हेतू स्थानिक स्तरावरील अनुभव आणि समस्या जाणून घेऊन उपजीविकेची साधने सुधारणे, पोषण सुरक्षा बळकट करणे, स्थलांतर कमी करणे आणि विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून अधिक प्रभावी काम करणे, हा होता. या बैठकांमध्ये तालुका प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, गावचे सरपंच, प्रकल्प गावांमधील शेतकरी महिला व पुरुष, तसेच 'ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशन' (बीएनएफ) आणि 'एमएसएसआरएफ'चे प्रतिनिधी उपस्थित होते. धडगावचे तालुका कृषी अधिकारी रमेश शिंदे यांनी या भागातील भौगोलिक आव्हानांचे सविस्तर विश्लेषण केले. ते म्हणाले की, "डोंगराळ भूप्रदेश, लागवडीसाठी मर्यादित जमीन आणि अतिवृष्टी होऊनही भासणारी पाणीटंचाई या आहेत. यावर उपाय योजना म्हणून पिकांवर काढणीपश्चात प्रक्रिया करणे आणि घरगुती अंडी सेवनासाठी 'परसबागेतील कुक्कुटपालना'ला प्रोत्साहन दिल्यास उत्पन्नाचे स्रोत वाढून पोषणात सुधारणा होऊ शकते." यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा यांनी कुपोषणाच्या मूळ कारणांवर भाष्य केले. बालविवाह, अपुऱ्या दिवसांची प्रसूती, जन्मतः बाळाचे कमी वजन, दोन मुलांमधील कमी अंतर आणि पूरक आहाराचा अभाव या विषयांवर समुपदेशनाची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच कुपोषण निर्मूलनासाठी केवळ आरोग्य किंवा एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएस) विभागच नव्हे, तर सर्वच यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले. अक्कलकुवा येथील सत्रात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या विविध योजनांवर चर्चा झाली, ज्यामध्ये शेती सुधारण्यासाठी 'जमीन समतलीकरण' करण्यावर भर देण्यात आला. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख श्री. राजेंद्र दहातोंडे यांनी उत्पादकता वाढवण्यासाठी मका व कडधान्यांच्या सुधारित वाणांचा वापर आणि महिलांना हाताळण्यास सोपी असणारी आधुनिक कृषी अवजारे उपलब्ध करून देण्याची सूचना केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तृप्ती पाटोळे यांनी बालविवाह आणि स्थलांतर या बाबी कुपोषणास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे सांगितले. स्थलांतरित लोकसंख्येचा मागोवा घेणारी यंत्रणा (ट्रॅकिंग मेकॅनिझम) कार्यान्वित केल्यास गरोदर महिलांना त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी 'टेक होम रेशन' वेळेत मिळेल, असे त्यांनी सुचवले. याचवेळी अंगणवाड्यांच्या पायाभूत सुविधांची दुरवस्था, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या मूलभूत सुविधांच्या अभावावरही उपस्थितांनी चिंता व्यक्त केली. 'बीएनएफ'चे डॉ. अजय सदानशिव आणि 'एमएसएस आरएफ'च्या डॉ. आर. व्ही. भवानी यांनी या बैठकांचे नेमके स्वरूप आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. 'बीएनएफ' संस्था थेट पोषण विषयक कामांवर लक्ष केंद्रित करत आहे, तर 'एमएसएस आरएफ' ही संस्था शेती व अन्न साखळी अधिक बळकट करण्यासाठी आणि लोकांची क्षमता वाढवण्यासाठी कार्यरत आहे. या सत्रात डॉ. वेणू मार्गम, महेश मस्के आणि किरण गोरे या प्रतिनिधींनीही तांत्रिक माहिती दिली. नंदुरबारच्या आदिवासी भागात उपजीविका आणि पोषण सुधारण्यासाठी सामुदायिक सहभाग आणि शासकीय समन्वय या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.



