*कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार व महिला आर्थिक विकास नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने सिंगपूर येथे महिला दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार व महिला आर्थिक विकास नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने सिंगपूर येथे महिला दिन उत्साहात साजरा*
*कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार व महिला आर्थिक विकास नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने सिंगपूर येथे महिला दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अक्कलकुवा तालुक्यातील सिंगपूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व महावीर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे, महिला सक्षमीकरणाचा संदेश पोहोचवणे तसेच महिलांना विविध शासकीय योजना, प्रक्रिया उद्योग आणि आर्थिक स्वावलंबनाबाबत मार्गदर्शन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे विश्वस्त यशपाल पटेल उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून रविंद्र मोरे (डीडीएम, नाबार्ड), नंदकुमार पैठणकर (जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, नंदुरबार) उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून दीपक पटेल (प्रकल्प संचालक, आत्मा नंदुरबार) व कांता गौरी बनकर (जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार) यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला ग्रामसेवक वसावे तसेच शाळेतील मुख्याध्यापक भामरे हे देखील उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. सावित्रीबाईंच्या फोटो प्रतिमेचे पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. प्रास्ताविक सौ. आरती देशमुख, विषय विशेष तज्ञ (गृह विज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये जागतिक महिला दिन 2026 ची थीम, महिला सक्षमीकरणाचे महत्त्व तसेच ग्रामीण महिलांसाठी मूल्यवर्धित अन्नपदार्थ व प्रक्रिया उद्योग यांच्या माध्यमातून उत्पन्नवाढीच्या संधी याविषयी सविस्तर माहिती दिली. महिलांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून लघुउद्योग उभारावेत व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असा संदेश त्यांनी दिला. प्रमुख अतिथी रविंद्र मोरे (नाबार्ड) यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध आर्थिक संधींबाबत मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग सुरू करून महिलांनी उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण करावेत, असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी सोया टोफू या पौष्टिक पदार्थाविषयी माहिती देत त्याचे महत्त्व सांगितले व उपस्थित महिलांना सोया टोफूचे वितरण करण्यात आले. नंदकुमार पैठणकर, जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, नंदुरबार यांनी महिलांना बँकेमार्फत उपलब्ध असलेल्या विविध विमा योजना, बचत योजना व आर्थिक सुविधा यांची माहिती दिली. महिलांनी बचत व विमा याकडे विशेष लक्ष देऊन आर्थिक सुरक्षिततेकडे पावले टाकावीत, असे त्यांनी सांगितले. दीपक पटेल, प्रकल्प संचालक, आत्मा नंदुरबार यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत आत्मा अंतर्गत राबविण्यात येणारे शेतकरी गट, महिला गट व अभ्यास सहली याबाबत माहिती दिली. महिलांनी या योजनांचा लाभ घेऊन शेती व शेतीपूरक उद्योगांमध्ये सहभाग वाढवावा, असे त्यांनी आवाहन केले.
कांता गौरी बनकर, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार यांनी बचत गटांचे महत्त्व, दूध संकलन व्यवसाय व महिलांच्या आर्थिक उन्नतीमध्ये बचत गटांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. महिलांनी एकत्र येऊन बचत गटांच्या माध्यमातून उद्योग उभारावेत, पुढाकार घ्यावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमात महिलांसाठी मनोरंजनात्मक उपक्रमही आयोजित करण्यात आले होते. विशेषतः संगीत खुर्ची यांसारखे विविध खेळ घेण्यात आले, ज्यामध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमांमुळे कार्यक्रमात आनंददायी वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतना सीएमआरसीच्या व्यवस्थापक सौ ज्योती वळवी यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले. त्यांनी संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन शैलजा पाडवी यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवर, आयोजक व सहभागी महिलांचे आभार मानले. या कार्यक्रमामुळे महिलांना विविध शासकीय योजना, आर्थिक संधी, प्रक्रिया उद्योग आणि महिला सक्षमीकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. ग्रामीण महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी देखील या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.



