*चिपळूण येथे कलगी तुरा समाज उन्नती समन्वय समितीची सभा संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चिपळूण येथे कलगी तुरा समाज उन्नती समन्वय समितीची सभा संपन्न*
*चिपळूण येथे कलगी तुरा समाज उन्नती समन्वय समितीची सभा संपन्न*
चिपळूण(प्रतिनिधी):-कलगीतुरा समाज उन्नती मंडळ समन्वय समितीची विशेष सभा रविवार दि. 8 जून 2025 रोजी समितीचे अध्यक्ष अभय सहस्रबुद्धे यांच्या परशुराम (चिपळूण) येथील निवासस्थानी यशस्वीरित्या संपन्न झाली. समन्वय समितीशी सलग्न मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली आणि सभेला अनुसरून सांगोपांग चर्चा करण्यात आली. कलगीतुरा या आपल्या वैभवशाली परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येक शाहिराने आपल्या पारंपरिक चौकटीला छेद न देता आपली कला सादर करून या लोककलेचा लौकिक अधिक वाढेल यादृष्टीने प्रयत्न करणे अभिप्रेत आहे. सभेदरम्यान समन्वय समिती व मंडळाची ध्येयधोरणे आपण तंतोतंत पाळू असा लिखित शब्द देऊनही काही शाहीर स्वतःच्याच वचनाला बांधील न राहता या लोककलेच्या संस्कृतीशी प्रतारणा करताना निदर्शनास येत आहे, त्यांना वारंवार समज देऊनही अपेक्षित बदल दिसत नाही, त्यामुळे संबंधित शाहिरांवर कायम स्वरूपाची व ठोस कारवाई करण्यात यावी असा निर्णय समन्वय समितीच्या माध्यमातून घेण्यात आला. या लोक कलेला शासन दरबारी न्याय मिळावा यासाठी समन्वय समिती व सलग्न सर्व मंडळे तसेच संबंधित पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत, शासनाने आपल्या पदरात अपेक्षित अनुदान टाकावे यासाठी शासनाला अभिप्रेत असणारी लोककला सादर करणे आवश्यक आहे, पर्यायाने त्यासाठी काही तांत्रिक बदल करण्याची देखील गरज असल्याचे सभे दरम्यान नमूद करण्यात आले. उदाहरणार्थ आपल्या लोककलेचा उगम हा "कलगी - तुरा" या नावाने झाला आहे आणि त्यानुसार स्थापन झालेली आपली मंडळे ही "कलगीतुरा समाज उन्नती मंडळ" या नावानेच नोंदणीकृत आहेत. शासनाच्या निकषानुसार कलगीतुरा याच नावाने या लोककलेचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. आजवर आपण "शक्ती तुरा" अशा आशयाने या लोककलेशी निगडीत जाहिरात करत आलो आहोत. परंतु यापुढे "शक्ती तुरा" याऐवजी "कलगीतुरा" असा उल्लेख असणारी प्रचार फलक तयार करण्यात यावेत आणि तसाच उल्लेख आपल्या बोलण्यातून सुद्धा व्हावा अशी भूमिका आजच्या सभेत मांडण्यात आली आणि ती सर्वानुमते मान्य करण्यात आली. या लोककलेच्या समृद्धीसाठी आवश्यक ते चांगले बदल करण्यासाठी आपण प्रत्येक कलावंत सदैव बांधील आहोत आणि राहिले पाहिजे. सभेमध्ये येणाऱ्या हंगामात सोज्वळ आणि समाजप्रिय कार्यक्रम सादर व्हावेत, शाहिरांनी आपल्या लोककलेची आणि स्वतःची अस्मिता अबाधित ठेवून सादरीकरण करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आणि संबंधित मंडळांनी व घराण्यातील वरिष्ठांनी आपापल्या शाहिरांना सूचना द्याव्यात असेही सुचवण्यात आले. सदर सभेसाठी समन्वय समितीचे विद्यमान अध्यक्ष अभय सहस्त्रबुद्धे, सचिव सुधाकर मास्कर, उपाध्यक्ष चंद्रकांत गोताड, मोहन घडशी, मुंबई मंडळाचे अध्यक्ष अनंत तांबे समवेत इतर पदाधिकारी, देवरुख मंडळाचे अध्यक्ष शांताराम मालप आणि पदाधिकारी, चिपळूण मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग जंगम आणि पदाधिकारी तसेच लांजा मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.